“अरे शिवल्या ती आधाराची दोन चाकं काढल्याशिवाय तू नाही शिकणार सायकल…”
“पण मी पडतोय ना?”
“पडूदे”
“हा पडूदे आणि लागूदे… शिवल्या बाबांचं नको ऐकू तू. येईल तुला नंतर आपोआप”
“आपोआप?”
“हो तू काय जन्मतः शिकून आलेलास का?”
“मी शेजार्यांच्या सायकली चोरून चालवून शिकलोय. आटलास… डोक्यापेक्षा उंच सायकली”
“पराक्रमच केलात मोठा”
“ओके. शिका कधी शिकायचं तेव्हा”
“बाबा कात्रजची बाग बनवायचीये…”
“बनव ना मग”
“मी झोपतोय तुम्ही बनवा ना प्लिज…”
“***वर फटके देऊ का?”
“पण…”
“प्रोजेक्ट मी स्वतः बनवलाय हे सांगता येईल एवढे तरी कष्ट कर”
“सॉरी बाबा”
मनगटावर संस्कार करायची संधी सापडत नाहिये…. किस्नाबाईच्या काठावरचा डोंगराएवढा वटव्रुक्ष… त्याच्या पैलतिरापर्यंत पाणी शोधत गेलेल्या मुळ्या… भुंड्या दुष्काळी माळाच्या छातीवर झुरमुळ्या हलवीत नाचणारी पिपरण… काहीतरी दाखवायला हवं त्याला. का त्याचं त्याला दिसेल सगळं? त्याला बघायची सवय लावावी लागेल की जगण्याच्या प्रवासात किंवा वाटेवर किंवा प्रवाहात वगैरे तो स्वतःच बघेल ते सगळं…? सटर फटर प्रश्न तर नेहमीसारखे पडतातच आपल्याला… हे ही तसलेच आसतील… पैशांच्या जंगलात हरवेल तो? नोटांच्या कुबड्यांशिवाय कसा जगेल तो? खेळणी ही खेळणीच असतात फक्त? त्यात कसलं आलय जगण्याचं तत्वज्ञान? मला वाटतय हे प्रश्न सटर फटरच असणार….
“बाबा मला धनुष्य पायजे”
“बनवू ऊद्या”
“बनवू?”
“हो. ऊद्या”
“जय गणेश व्हरायटीत गोल्डन मिळतो तोच हवा”
“अरे आता बनवत कुठे बसतो दे ना आणुन ५० रुपयात तर आहे.”
“बरं… आणतो.”
सोनेरी रंगाच्या धनुष्यानं पोरगं भिंतीवरच्या घड्याळावर नेम धरतं आणि मी एक डोळा मिटून महादेवाच्या देवळाच्या दगडी भिंतीवर उगवलेल्या पिपळावर बसलेल्या पोपटाकडे बाण सोडतो.
शनिवारी दुपारी शाळा सुटल्यावर माळ्यावरची कापड फाटलेली छ्त्री… तिची एक काडी कमान होते… गळ तुटलेल्या छ्डीचा तंगुस ताणून धनुष्य होतो. ज्वारीच्या गणगाट्याला बाभळीचा काटा लावला की बाण होतो… दारात फिरणार्या कोंबडीवर पहिला निशाणा… मग शिकारीला प्रस्थान…
“बाबा हा बाण फुसका आहे”
“अबे पोपट पाडला ना देवळावरचा…”
“पोपट?”
“काय नाय. काय झालं बाणाला?”
” घड्याळ टीपतच नाही. इथेच पडतोय जवळ”
“मग आता काय?”
“मला भवरा आणा”
“का पतंग आणू?”
“नको त्यापेक्षा रिमोट कार आणा…”
“ओके बेटा. उद्याच जयगणेश व्हरायटीत जातो…”
पोरगं जाम खुश होतं.
पन्नास शंभरात विकत मिळणार्या या खेळण्यांसाठी आपण केवढे झिजलो ना? पण ह्याला तसं नाही करावं लागणार जय गणेश वाल्याने त्याच्या मनगटाची मशागत रोखून ठेवलीये… त्या मनगटावर आता घामाचे ऊमाळे जन्मणार नाहीत… तिथे गवत माजत जाईल… कचरा साचत जाईल… विकत घेतलेल्या आनंदाचे एवढे थर बसतील की मनगटातल्या चैतन्याची कबर मनगटावरच बांधली जाईल…
अरे देवा केवढासा विषय आणि केवढे ते पाल्हाळ…?
आपली खेळणी आपण नाही बनवली आणि जे मागेल ते दुकानात मिळाले तर त्याच्या व्यक्तीमत्वावर काय असा मोठा परिणाम होणारेय…? तुम्ही बाण, लगोर्या, गाड्या स्वतः बनविल्या कारण जय गणेशवाला तेव्हा गुजरात सोडून महाराष्ट्रात आला नव्हता… शहरात कुठून आणणार छत्रीच्या काड्या, तंगूस गणगाटे? बाभळी दिसतात का तुम्हाला टोकाला काटे लावायला? आणी नेम काय चिकन सेंटर वाल्याच्या कोंबड्यांवर लावायचा का? सटर फटर लिहायचं म्हणजे झालं…
पाणी शोधत फिरणार्या मुळ्यानी वडाला डोंगराएवढं मोठं केलं…. माळावरच्या ऊन्हाच्या झळा पिपरणीनं सुसह्य केल्या… आमचा बाण भलताच पावरफूल बनला नाही पण फुसकाही निघाला नाही….
हे सगळं भुतकाळी भराड काळजाच्या देवळात घुमत राहतं… आणि जय गणेशच्या व्हरायाट्यांनी झपाटलेल्या झाडांना मोकळं करावं असं वाटून जातं…
पण च्यामारी ह्याचा संस्काराशी आणि व्यक्तीमत्वाशी काही संबंध आहे का?